मुंबई पाठोपाठ सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक
सांगली : मुंबई शहरातील मृत्यूदर 5.42 इतका आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. चोवीस दिवसात 267 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.96 टक्क्यांवर पोहचला आहे.ही बाब चिंता वाढवणारी आहे.दुसऱ्या बाजूला एकुण रुग्णसंख्येतील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 61.12 टक्क्यांवर गेले आहे.सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या चोवीस दिवसात झपाट्याने वाढ झाली आहे. 31 जुलै रोजी एकुण रुग्णसंख्या 2 हजार 643 इतकी होती. त्यावेळी त्यातील 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
त्यावेळी मृत्यूदर 3.47 टक्के होता. गेल्या चोवीस दिवसांत 6 हजार 51 रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यूची संख्या 345 वर पोहचली आहे. सध्या मृत्यूदर चिंता वाढवणारा ठरत आहे. मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. चाळीसच्या आतील तरुणांचे मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात उच्चांकी 25 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक दिसून आली. सद्यस्थितीत चारशेहुन अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 75 जण व्हेंटिलेटरवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

353 जण ऑक्सिजनवर आहेत.दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मुंबई शहरात 137096 इतकी रुग्णसंख्या असून त्यापैकी 7442 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 5.42 इतका आहे.
रुग्णालये हाऊसफुल्ल : गेल्या चोवीस दिवसांत रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या दिवसागणीक वाढत असून रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. उपचारासाठी खाटा मिळेना झाल्यात. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयाबाहेर वेळ उपचार न मिळाल्यामुळे तरूणाचा जीव गेला. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज आहे.
