सांगली जिल्ह्यातील चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष | वाचविण्यासाठी | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती

0
4

                        प्रतिकात्मक

मुंबई : मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

            मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात मंत्री. श्री. ठाकरे म्हणाले की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल मंत्री श्री. ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.

तथापि, मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून देखील जातो. मोजे भोसे गावातील गट क्र.436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे.

तथापि, नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र.166 च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री श्री. ठाकरे यांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here