आ.विक्रमसिंह सांवत यांनी घेतली महसूल प्रशासनाची झाडाझडती

जत,प्रतिनिधी : आ.विक्रमसिंह सावंत यांनी महसूल विभागातील मंडल अधिकारी,तलाठी यांच्या मनमानी कारभार यापुढे चालणार नाही.कोणत्याही प्रकारे शेतकरी,सामान्य जनतेला त्रास होता कामा नये असा इशारा देत महसूलच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.बुधवारी महसूल विभागाच्या अडचणी व विविध शासन योजनासंदर्भात आ.सांवत यांनी जत तहसील कार्यालयात बैठक घेतली.
बैठकीस प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्यासह सर्व मंडल अधिकारी,तलाठी उपस्थित होते.
मंडल अधिकारी, तलाठी, सज्जावर राहत नाहीत. सातबारा नोंदीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जातो.यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.सर्वसामान्यांना जर त्रास झाला तर कारवाई अटळ असल्याचा इशाराही आ. सावंत यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.मी स्वतः अचानक भेट देवून महसूल अधिकारी सज्जावर राहतात की नाही याची चौकशी करणार आहे.महसूल प्रशासनाने यांची गंभीर दखल घ्यावी. प्रांताधिकारी,तहसीलदार यांनाही आपण याबाबत स्वतः लक्ष घालावे,अशा सूचनाही त्यांनी दिली. तहसीलदार यांच्याकडे रस्त्याच्या निकालाबाबत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.रस्त्यावरून गावोगावी वाद होत आहेत एवढेच नव्हे तर या रखडलेल्या तक्रारीमुळे खुनासारख्या घटनाही घडल्या आहेत.त्यामुळे रस्त्याची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, अशा सूचना आ. सावंत यांनी तहसीलदार पाटील यांना दिल्या. तलाठ्याकडून दस्तावरून सातबारा नोंदी घालण्यास विलंब लागत
असल्याबाबत त्यांनी जाब विचारला.जत तालुक्यातील परिस्थिती अडचणीची आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आधार द्यावा,सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांनी काळजी घ्यावी असेही यावेळी सांवत यांनी दिली.
आ.सांवत यांनी तहसील कार्यालयात लावलेल्या वाहनाही पाहणी केली.