संख पेयजल पाणी योजना : चौकशीसाठी 26 पासून आमरण उपोषण
संख,वार्ताहर : संख(ता.जत)येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषी, अधिकारी,कंत्राटदारावरांसह संबधितावर कायदेशीर कारवाई टाळाटाळ केली जात आहे. पाणी योजनेची चौकशी व्हावी व योजनेचे काम गतीने पुर्ण करावे या मागणीसाठी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 26 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.तसे निवेदन संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे,संखसाठी आठ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल या योजनेतून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे.ती आजतागायत पूर्ण झाली नाही.योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कोणतीही कामे नियमानुसार नाहीत,खोटी मानपुस्तके करून बिले काढली आहेत.नियम तोडून बिलाचे वितरण केले आहे.टेंडर न करता रोजगार हमी योजनेच्या एका मजूराच्या नावावर योजनेची तीन कोटीची कामे दिले आहेत. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. भ्रष्टाचार झाल्याचे बरेचसे मुद्दे समोर अाहेत.आम्ही रीतसर संबंधित विभागाला याची चौकशी व्हावी अशी मागणी केली असूनही अद्याप त्यावर कारवाई झाली नाही.त्यामुळे या प्रकरणाला काही अधिकारीच पाठीशी घालत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी योजना अर्धवट राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी सुद्धा विकतचे पाणी घ्यावे लागते आहे. शुद्ध पाण्याचा मोठा प्रश्न संखमध्ये आहे.शासनाने कोट्यावधीचा निधी देऊन ही योजना रखडली आहे.त्याची चौकशी होत नाही,काम सुरू होत नाही.त्यामुळे आम्ही पुढील कारवाई व्हावी,यासाठी आमरण उपोषणास बसणार आहोत,असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील,तालुकाध्यक्ष रमेश पाटील,शाखाध्यक्ष नागनाथ शिळीन,राजू पुजारी,चंद्रशेखर रेंबगोड,भीमाशंकर बिराजदार, विठ्ठल कुंभार,शरणाप्पा शिळीन, विश्वनाथ बिराजदार,भीमराव बिराजदार,रमेश न्हावी यांच्या सह्या आहेत.