दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा सरसकट अन्नसुरक्षा यादीत समावेश़ करावा;विजयकुमार बगली

0
8

 जत तालुक्यातील दोन्ही हंगाम वाया गेल्याने अन्नधान्याचाही प्रश्न गंभीर

सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे जनता त्रस्त आहे.खाण्यापिण्यापासून पाणीटंचाई, जनावरांचा चारापर्यत प्रंचड त्राण येथील जनतेवर पडला आहे.कोणताही पर्याय नसल्याने स्थलांतर करावे लागते.त्यामुळे जनतेला किमान जगणे सुसह्य व्हावे,यासाठी शासनाच्या बहुचर्चित अन्नसुरक्षा योजनेत आता दुष्काळग्रस्त शेतकरी, नागरिक,शेतमजूर यांचा सरसकट समावेश करावा,अशी मागणी सोन्याळचे ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली यांनी केली आहे.
ते म्हणाले जत पूर्व भागातील अनेक शेतकरी नागरिक हे अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित आहेत.त्यांना सध्या या दुष्काळात मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे.प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा,जगण्यासाठी अन्नधान्य नाही,काय करायचे अशा द्विधा मनस्थितीत येथील जनता आहे.त्यांना आता शासनाने आधार देणे गरजेचे आहे.मोठा जमिनदार शेतकरी शेतमजूर झाला आहे. पुर्व भागातील शेतकरी पश्चिम भागातील ऊसतोड करू लागले आहेत.यापुढे दिवस बिकट आहेत.जीवन जगण्यासाठी आता हक्काचे धान्य मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, नागरिक,शेतमजूर यांचा अन्नसुरक्षा योजनेत सरसकट समावेश करून त्यांना धान्य द्यावे. तालुक्यातील अपात्र शिधारकांचा सर्वे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. तालुक्यात सध्या मोठ्या संख्येने अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेले नागरिक आहेत.त्यांना धान्य मिळत नाही.यापूर्वी राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय,बीपीएल, केसरी, अन्नपूर्णा व शुभ्र अशा वेगवेगळ्या शिधापत्रिकेद्वारे अन्नधान्याचे वितरण होत असे. मात्र अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना बाकीच्या सर्व शिधापत्रिका रद्द करून अंत्योदय व इतर अशा दोनच प्रकारच्या शिधापत्रिका ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार धान्य वितरण केले जाते.सध्या या कायद्यामुळे अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति कुटुंब महिना गहू व तांदूळ असे 35 किलो धान्य वितरण केले जाते तर इतर शिधाधारकांना फक्त पाच किलो धान्य प्रत्येक महिन्याला कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे देण्यात येते.यादोन्ही प्रकारातील धान्य गहू दोन रुपये प्रति किलो, तांदूळ तीन रुपये प्रति किलो या दराने तर भरडधान्य प्रति किलो एक रुपये दराने वितरण होते.सध्या दिले जाणारे धान्य हे फक्त द्रारिद्र्यरेषेखालील शिधाधारकांना मिळते,अन्य शिधापत्रिका धारक यापासून वंचित आहेत. सध्या जत तालुक्यातील पावसाअभावी दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी,शेतमजूर,युवकांच्या हाताला काम नसल्याने बेकार आहेत.जगण्याची अवस्था वाईट बनली आहे.गंभीर दुष्काळाच़्या शासनाच्या योजना मुंबईतून घोषणा झाल्या, मात्र शेवटपर्यंत फक्त माहिती मिळाली आहे. त्यातून लाभ अद्याप पर्यंत मिळाला नाही. त्यामुळे या भागातील जनतेला जगण्यासाठी विघ्न पार पाडावे लागत आहे.यापुढे येथील जनतेला टिकवायचे असेल,तर तालुक्यातील सर्व कुटुंबाचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करून धान्य द्यावे.अन्यथा तालुक्यातील गावे गावे ओस पडतील.याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे.जनतेसाठी आता लोकप्रतिनिधींनी एकत्र येत न्याय हक्कासाठी लढण्याची गरज आहे,असेही शेवटी बगली म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here