जत | तहसील कार्यालयात अनागोंदी दाखल्यांसाठी मोजावे लागतात पैसे;शालेय दाखल्यामुळे चांगभले ! |
जत,(का.प्रतिनिधी):दलालांच्या जाळ्य़ात फसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखल्यांसाठी पैसे मोजूनही तहसील कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागतात. नागरिकांकडून पैसे उकळणार्या एजंटांचा थेट कार्यालयात मुक्त वावर असून कपाटातील फाईल काढून साहेबांपुढे स्वाक्षरीला ठेवण्यापर्यंतची ‘सेटिंग’ एजंटांमार्फत बिनधास्तपणे पार पडते. दलालांच्या मदतीने कोणीही येऊन कागदपत्रांच्या ढिगार्यात हात घालून आपआपल्या दाखल्यांचा शोध घेतात अशी चर्चा आहे.
शैक्षणिक प्रवेश मिळवण्यापासून ते सवलतीचा लाभ घेण्याकरिता उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, तसेच रहिवासी, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला मिळवण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालयांत सर्वसामान्यांची गर्दी वाढू लागली आहे.
उत्पन्नाचा दाखला पाहिजे असला तरी तलाठी कार्यालयापासून प्रक्रिया सुरू होते. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या फेर्या न मारता काम व्हावे, अशी अपेक्षा बाळगणारे स्वत:च दलालांच्या जाळ्य़ात अडकतात. तहसील कार्यालयात कोणी माहिती देत नाही; परंतु परिसरात थांबून चौकशी केल्यास महा-ई-सेवा केंद्राचे काही प्रतिनिधी स्वत:च एजंटांचा पर्याय सुचवतात.
शहराच्या विविध भागात चालविण्यात येणार्या महा-ई-सेवा केंद्रात जमा होणारे विविध दाखल्यांसाठीचे अर्ज एकत्रितपणे तहसील कार्यालयात आणले जातात. तहसील कार्यालयात मंजुरी मिळाल्यानंतर तयार झालेले दाखले महा-ई-सेवा केंद्रांचे संचालक त्यांच्या केंद्रातून संबंधित अर्जदारांना वाटप करतात.
या प्रक्रियेत तहसील कार्यालय परिसरात फिरणार्या दलालांची सर्रासपणे मदत घेतली जात असल्याचे चित्र समोर आले. महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन थेट अर्ज देणार्यांचे प्रमाण कमी असून तहसील कार्यालयामार्फत दाखला प्राप्त करणार्यांची संख्या मोठी आहे.