दहा हाजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट पाऊस लांबल्याने खरिपाचा पेरा वाया जाण्याची शक्यता : अजून 50 टक्के पेरण्या खोळंबल्या

0

जत,प्रतिनिधी: जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने खरिपाची लगबग सुरू केली. तालुक्यात सर्वांत मोठ्या प्रमाणात घेतल्या जणाऱ्या बाजरी,मका,उडीद पिकाची  पेरणीही केली. पहिल्या आठवड्यात दोन दिवस सुमारे 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली; मात्र तो गायबच झाला.खरिप उत्पादक तर केलेल्या पेरण्या वाया जातात की काय? यामुळे चिंताग्रस्त आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचे दमदार आगमन झाले. गेले आठ दिवस जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. जुनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी सारखा पाऊस झाला. पुढील दोन दिवसांच्या काळात जोरदार पाऊस होणार असल्याच्या आशेने खरिपाची पेरणी करण्यात व्यस्त झाला.
शेतकरी सात जूनच्या मृगाच्या पावसावर जास्तीत जास्त अवलंबून असतो. यावर्षी मृगाच्या पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्याने शेतीची मशागत करून पेरणीला वेगाने सुरुवात केली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पेरणी केलेले बियाणे वाया जाणार, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत 30 टक्केपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीपाचे नियोजन कोलमडणार नाही. मात्र आणखी दडी मारली तर  उत्पादकांना फटका बसणार आहे.

आता बरस रे घना!
संख  : जत तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला होता. शेतकरी आनंदित होऊन पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतला. मात्र आठवड्याभरापासून वरुणराजाने अचानकपणे दडी मारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आभाळ आलंय, पण पाऊस कुठाय? आता बरस रे घना, अशी आर्त हाक बळीराजा मारू लागला आहे. अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन बिघडले आहे. ऐन पावसाच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्याचा हंगाम पेरणीचा असताना पाऊस नसल्याने मका, भुईमूग, बाजरी, उडीद सह कडधाने या पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडत चालल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. कधी कधी कडाक्याचे ऊन पडत असल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू झाला आणि बळीराजा जोमाने शेतीच्या कामाला लागला. बियाणे खरेदी केली.
खताचा पुरेसा साठा जमा करून ठेवला. या हंगामात तरी चांगले पीक होईल, अशी अपेक्षा असताना पावसाने हुलकावणी दिली असून जत तालुक्याच्या पूर्व भागात निसर्गाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. परंतु पावसाळा सुरू होऊन आठ दिवस पाऊस पडत नसल्याने शेतकरी आभाळाकडे टक लावून पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट
शेगाव : तालुक्याच्या दक्षिण,पश्चिम भागात खरिपाच्या पेरणी होऊन 10 दिवस झाले; मात्र काही ठिकाणीच पिकांची उगवण झाली आहे. आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बी जमिनीतच सुकू लागले आहे. काही दिवस अशीच परिस्थती राहिल्यास दुबार पेरणीचे संकट परिसरातील शेतकऱ्यांवर येऊ शकते. यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
तालुक्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस झाल्यावर तालुक्याच्या शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरणी करतात. या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच बियाण्याची पेरणी केली होती. त्यानंतर पाऊस पडल्याने काही ठिकाणी पिंकाची उगवण झाली आहे. मात्र, त्यानंतर 10 दिवस होऊनही पावसाने दडी मारल्याने पेरलेले बी सुकू लागले असून उगवण झाली नसलेले बी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर,काही भागातील शेतकरी जमिनीला चांगला वाफसा आल्यावरच पेरणी करतात. अद्याप तेथे पेरणी झालेली नाही. त्यामुळे मागील आठवडाभरापासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. तालुक्यात एकूण 111 गावे आहेत.

Rate Card

जून संपत आला, तरी…

बिंळूर : हवामानखात्याने दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून सर्वत्र दाखल होईल. या भरवशावर जत तालुक्यातील शेतकरीवर्ग सुखावला होता. सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या.  अर्धा जून महिना संपत आला तरी पिकासाठी लागणाऱ्या पावसाचे आगमन होत नाही. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्याच्या चारही भागांत पेरण्या झालेल्या आहेत. मशागतीची कामे उरकली असून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून चातकाप्रमाणे मॉन्सूनची वाट पाहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.