सुस्त बांधकाम विभागाचा छुपा पांठिबा ; सहा महिन्यात रस्त्यावर खड्डे
जत,प्रतिनिधी : राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून मिळालेल्या निधीतून यावर्षी जत तालुक्यातील पुर्व भागातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर वाहतुकीला चांगला वेग येणार आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र, या सर्वच कामांच्या बाबत स्थानिक लोकांच्यामधून तक्रारी सुरू आहेत. कोट्यवधीचा निधी खर्च होत असल्याने दर्जेदार व दीर्घकाळ टिकाऊ रस्ते होणे अपेक्षित आहे. मात्र, या कामांचे नियोजन व देखरेख करणारी बांधकाम विभागांची यंत्रणा पुरेसे लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या विजापुर-गुहागर या दोन राज्यमार्गावरून प्रचंड वाहतूक वाढली आहे. या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून कामे होण्यासाठी मागील दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. गेल्यावर्षी हे कामे मंजूर झाली. यासाठी सुमारे 30 कोटीवर निधी उपलब्ध झाला आहे. एकच ठेकेदार असल्याने गेल्या वर्षापासून धिम्यागतीने काम सुरू आहे. दहा मीटर रुंदीने डांबरीकरण, बाजूपट्ट्या अशी कामे सुरू आहेत. त्यात गती येणे गरजेचे आहे.
त्याशिवाय स्थानिक राज्यमार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्या स्त्यांच्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू आहेत. डांबरमिश्रित होणारे खडीकरण योग्य प्रकारे होत नाही. बऱ्याच ठिकाणी पुढे काम सुरू असताना मागे ते विस्कटत असल्याचे दिसत होते. दोन भाग जोडताना तयार होणारे उंचवटे अपघाताला निमंत्रण देणारे ठरणार आहेत. मोठ्या मशिनरीच्या साहाय्याने कामे होत असूनही काही ठिकाणी खडबडीतपणा तसाच आहे.निकृष्ट काम होत असल्याने काही लोकप्रतिनिधी व नागरिकांनी हे काम बंद करण्यास भाग पाडले होते. ही कामे करणारे ठेकेदार कोणी असले तरी मजूर व अन्य यंत्रणा बहुतांश विजापूर भागातील असते. त्यांना भाषेतील अडचणीमुळे स्थानिकांनी केलेली सूचना समजत नाही व ते आपल्या हेक्यात बदल करत नाहीत. ठेकेदार- अधिकारी यांचे संगनमत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हे कामाचा दर्जा घसरण्याचे प्रमुख कारण आहे.सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम या विभागांचे या कामावर नियंत्रण असते. मुख्य अधिकारी, अन्य कर्मचारी क्वचित कार्यालयात असतात. कामावर त्यांची फिरती असल्याचे सांगण्यात येते. मग त्यांच्या नजरेस ही कामे कशी पडत नाहीत असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो.राज्यात व देशात सरकार बदलले. मात्र, बांधकाम विभागांच्या कामकाज पद्धतीत काहीच बदल झालेला नाही. रस्त्यांच्या डांबर वापरात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्यानेच रस्ते टिकत नाहीत, असे लोकांचे मत आहे. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत केलेले विधान बरेच काही सांगून जातेे.





