जत,संकेत टाइम्स : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी कालावधीही निघुन जात असल्याने यंदाच्या पेरण्याही यशस्वी होतील की नाही? या विवंचनेत बळीराजा आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन पावसाची वाट पाहत आहे.
सांगली जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली मात्र जत तालुक्यात अद्यापही एकही पाऊस समाधानकारक झाला नाही त्यामुळे शेतकरीराजा सध्या चिंतेत आहे. त्यामुळे शेतीचे कामे देखील खोळंबली आहेत. आतापर्यन्त शेतातील नांगरणीचे ढेकळे पण तसेच आहेत. शेतात वखरणी करायची पण पाऊस न झाल्यामुळे हे शेतातील ढेकळे फुटत नाहीत. आता बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.
ऊसणवारीच्या पैशातून खत, बि– बियाणे
पदरमोड करुन, ऊसणवारी करुन खत, बि-बियाणे शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत.काही शेतकऱ्यांनी गत पंधरवड्यात पडलेल्या पावसावर केलेल्या पेरण्यालाही आता फक्त प्रतीक्षा फक्त पावसाची आहे. यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात केली आहे. मात्र जत तालुक्यातील अनेक गावामध्ये अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत.
जूनच्या पहिल्या पावसानंतर परिसरात पावसाने दडी मारली आहे. पहिल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी उडीद,कडधान्ये,बाजरी मका यासारखी पिंकाची लागवड केली. मात्र लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हावालदिल झाला.