जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला वरदान असणारी म्हैसाळ सिंचन योजना पावसाळ्यात कार्यन्वित करून तालुक्यातील सर्व तलाव भरून द्यावेत,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली.तसे निवेदन त्यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला जुलै ते ऑक्टोंबरच्या दरम्यान धरण क्षेत्रात मोठा पाऊस पडत असल्याने पूर परिस्थिती होते.मोठ्या प्रमाणात नागरिकांना फटका बसतो,तसेच प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. याच कालावधीत जत विधानसभा मतदारसंघातील गावांना पिण्याचे व सिंचनाच्या पाण्याची प्रचंड टंचाई असते.
पावसाळ्यातील कृष्णा नदीतून अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून जत सारख्या दुष्काळी भागातील तलाव भरून घेतल्यास जत तालुक्यातील पाणी टंचाई दूर होईल.तसेच दुष्काळातील पाणीटंचाई व चारा टंचाईसाठी महसूल यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना कराव्या लागणार नाहीत.जत तालुक्यात टंचाईसाठी साधारणपणे १७ ते १८ कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात. त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणाही कार्यरत असतात.
हा खर्च वाचविण्यासाठी व जत तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी पावसाळ्यात म्हैसाळ योजना सुरु करून लाभक्षेत्रातील तलाव भरून द्यावेत,अशी विंनतीही आमदार सांवत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.