जत,संकेत टाइम्स : जत शहरातील वाहतुकीची अडचण लक्षात घेता व येणाऱ्या तक्रारी विचारात घेऊन ती तात्काळ सोडवण्याबरोबरच शहरांतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी नगरपरिषद, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे व पोलीस विभाग यांना तत्काळ रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश आ.विक्रमसिंह सांवत यांनी दिले.
आ.सांवत म्हणाले, विजयपूर- गुहागर महामार्गावर सोलणकर चौक, महाराणा प्रताप चौक, एसटी स्टँड, मार्केट यार्ड व बसवेश्वर चौकात वाहतुक बराच काळ खोळंबलेली असायची. शिवाय दुकानाच्या समोर होणाऱ्या गाड्यांची आंदाधुंद पार्किंग त्यामुळे वाहतुकीला नाहक त्रास सहन करावा लागत होता. महाराणा प्रताप चौक, मंगळवार पेठ,बनाळी चौक व गांधी चौक, पोस्ट ऑफिस नगरपरिषद ,लोखंडी फुल, संभाजी चौक या ठिकाणी मोठी गर्दी व वाहतुकीची समस्या जाणवत होती. याबाबतीत संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.
त्याची दखल घेऊन ही सदरची तडक कारवाई करण्याचे आदेश दिले.यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, नॅशनल हायवेचे अधिकारी तथा काँग्रेसचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.