कवठेमहांकाळ : रत्नागिरी नागपूर महामार्गावर नागज येथून तीन किलोमीटर अंतरावरील विठ्ठलवाडी जवळ पंढरपूर येथे देवदर्शनासाठी भाविक घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रक मधील ४० भाविक जखमी झाले आहेत.यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व भाविक बेळगाव जिल्ह्यातील आहेत.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला.या अपघाताची कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याने ग्रामस्थ तसेच वाहनचालकातून नाराजी व्यक्त होत आहे.बेळगाव जिल्ह्यातील शिरहट्टी (ता.- हुक्केरी)गावातून जवळपास पन्नास भाविक ट्रक मधून (केए २३-४८८५)पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते.ट्रक विठ्ठलवाडी गावाजवळ आला असता काँक्रिट रस्ता सोडून कच्चा रस्ता अचानक समोर आल्याने तसेच पुढे पंढरपूरकडे जाणाऱ्या बसला ट्रक धडकू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्यामुळे ट्रक जागीच पलटी झाला.
यामध्ये ट्रक मधील सुमारे ३५ प्रवासी भाविक जखमी झाले.जखमी पैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.सर्व जखमींना प्रथम कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार बी.जे.गोरे,सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह पोलीस कर्मचारी ए.एन.भोसले,चव्हाण,पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.जखमींच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत. काहींचे हात मोडले आहेत,खांदे निखळले आहेत.काहींच्या पाठ तसेच मणक्याला इजा झाल्याचे समजते.
विठ्ठलवाडी जवळ वारंवार अपघात घडत असूनही रस्ता बनविण्याचे कंत्राट घेतलेल्या डीबीएल कंपनीकडून दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.घटनास्थळी जखमींचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.विशेषतः महिला जखमींचे विव्हळणे स्थानिकांना पाहवत नव्हते.