मुंबई : जत तालुक्यातील म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली असून एक जानेवारीपासून याची निविदा प्रक्रियाही सुरू होणार आहे. तब्बल दोन हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे जत मधील ४८ गावे ओलिताखाली येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये या योजनेतील सुमारे ६ टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्या बदल्यात तुबची बबलेश्वर योजनेतील पाणी जतच्या वंचित भागात देण्याबाबत पत्रव्यवहारही झाला होता. परंतु कर्नाटक सरकारने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जतमधील सुमारे ४८ गावांमधील ३० हजार हेक्टर जमीन ओलिताविना राहिली. त्याचेच पडसाद नव्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या निर्णयामुळे जतमधील पाण्याचे प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.