महाराष्ट्र शासनाचा निर्णय : आ. सुमन पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शासनाला जाग
तासगाव : दुष्काळी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १९ गावातील शेतक-यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार सुमन पाटील आणि मुलगा रोहित हे उद्यापासून सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भागातील सर्व शेतक-यांना सोबत घेऊन आमरण उपोषणाला बसणार आहेत. या इशा-यानंतर सुट्टीदिवशीही शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास महाराष्ट्र शासनाने रविवारी अंतिम मंजूरी दिली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या उप सचिव जया पोतदार यांनी रविवारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे.
टेंभू योजनेसाठी मंजूर असलेल्या २२ टी. एम. सी. पाण्याचे वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्यामुळे आणखी नविन गावे आणि क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता नव्हती त्यामुळे गेल्या ३० वर्षामध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार अनिल बाबर, खासदार संजय पाटील, आमदार सुमन आर आर पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज आणि ताकदवान लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा करुनही या १९ गावांचा समावेश होऊ शकला नव्हता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील जलसंपदामंत्री असताना राज्य शासनाने पत्र जा. क्र. २०२१(२१६/२०२१) दि २९/०४/२०२२ नुसार ८ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी टेंभू उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतू ही तत्वत: मंजूरी होती. तोपर्यंत विस्तारीत टेंभू उपसा सिंचन योजनेचा तृतीय प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल महाराष्ट्र शासनास ८ मे २०२३ रोजी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
आठ टी. एम. सी. पाण्यासाठी अंतिम मंजूरी मिळावी आणि उतलब्धता झालेनंतर या १९ गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी तृतीय सु.प्र.मा. मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आमदार सुमन पाटील आणि सुपुत्र रोहित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे
आमदार सुमन आर आर पाटील यांच्या उपोषणाच्या इशा-यानंतर सुट्ट्या असताना जलसंपदा विभागाचे वरिष्ठ मात्र कामाला लागलेले आहेत. ८ मे २०२३ रोजी तत्वत: मंजूरी मिळालेल्या टेंभू विस्तारीतच्या आठ टी.एम.सी.पाण्यास अंतिम मंजूरी देण्यासाठी दोन तीन दिवसापासून शासकीय यंत्रणा ही कामाला लागली होती. आज अंतिम मंजूरी देण्यात आली.
सु.प्र.मा. मिळेपर्यंत उपोषण करणारच…!
दरम्यान आमच्या मागण्यापैकी पहिली मागणी मान्य झाली आहे. टेंभू विस्तारीतच्या अहवालास तृतीय सुधारीत मान्यता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढा सुरु राहणार आहे.
गांधी जयंतीपासून शेतक-यांसह आमरण उपोषणाचे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी सांगितले आहे.