जत : जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमावा लागला आहे. मात्र याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
जत तालुक्यातील खंडनाळ येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामु कुलाळ वय 45 यांचा शेळ्या मेंढ्यांना पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजीबा थोरात यांचे शेततळ्यात पडुन मृत्यू झाला आहे.
या गंभीर घटनेकडे स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, कृषी विभाग तसेच लोकप्रतिनिधीनी कोणतेही लक्ष दिले नसल्याने आज तम्मनगौडा रवीपाटील यांनी थेट गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला. तसेच शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मेंढपाळाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.
रविपाटील म्हणाले की, जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून माणसे यांच्यासह जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: मेंढपाळ यांना शेळ्या मेंढ्यांना पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आपल्या शेळ्या मेंढ्यांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यात गेले असतात पाय घसरून पडून सदर मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. जनावरांना पाणी देण्यासाठी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला ही बाब गंभीर आहे. सध्या भीषण पाणी टंचाई असल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र या घटनेची शासकीय पातळीवर दखल घेतली नाही. ही बाब अत्यंत खेदाची आहे, असे रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाड्या वस्त्यांवर गंभीर पाणीटंचाई आहे. मोठे टँकर दिल्याने वाड्यावर पाणीपुरवठा करणे कठीण होत आहे. त्याऐवजी 12000 लिटरचे छोटे टॅंकर देण्यात यावे अशी मागणी रवीपाटील यांनी केली. यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष हणमंत गडदे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजू पुजारी उपस्थित होते