80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोत
सांगली : राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
दि. 4 जून पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तर दि. 5 जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवली आहे.
सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देवून तयार करावी, असे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.