जतच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार | आ.गोपीचंद पडळकर

0
149

जत : तालुक्यातील मूळ म्हैसाळ योजनेतून वेळेवर पाणी देणे, विस्तारित म्हैसाळ योजना पूर्णत्वासाठी प्रयत्न सुरू आहे, तालुक्यात नव्याने लागणारे ५३३ ट्रान्सफॉर्मर निरंतर योजनेतून मंजूर करणे, विस्तारित योजनेसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपये निधीच्या कामाची तरतूद करणे, नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटारी पाणी प्रश्न व प्रशासकीय इमारत हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, रस्त्याचा दर्जा सुधारणे यासह आजवर तालुक्याच्या विकासाचा असलेला बॅकलॉग भरून काढणार असल्याची माहिती आ. गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आ. पडळकरांचे मास्टर प्लॅनने काम सुरू
★१५ जानेवारीच्या आसपास सुरू होणार म्हैसाळचे आवर्तन.
★ विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू, मार्चला ५०० कोटींची आवश्यकता; मुख्यमंत्र्यांनी दिली निधीची ग्वाही.
★ उमदी पंचतारांकित एमआयडीसी नववर्षात मिळणार लवकरच गुडन्युज.
★ संख मध्यम प्रकल्पावर उभारणार मोठा सोलर प्रकल्प.
★ चार जानेवारीला वरिष्ठ जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत सात ठिकाणी होणार शेतकऱ्यांसमवेत बैठका.
★ जतला हवेत ५३३ ट्रान्सफार्मर त्यासाठी ५२ कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा
★ मेंढेगिरी, शेडयाळ, व्हसपेठ येथील पवनऊर्जा सबस्टेशन लवकरच येणार शासनाच्या ताब्यात.
★ जतमध्ये घेणार अपंगाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कॅम्प, जनता दरबारही भरविणार.
★ जतमध्ये उभारणार श्री बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा, सुशोभीकरणासाठी ७५ लाखाची निघाली निविदा.
★ पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांचे जतमध्ये उभारणार स्मारक; ७५ लाखाची निघाली निविदा.

यावेळी सिमेंट कार्पोरेशन दिल्लीचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामद, जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील, संजय तेली, भाऊसाहेब दुधाळ उपस्थित होते.

आ. पडळकर म्हणाले, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी, ठेकेदारांनी ताकदीने हे २०२३-२४ मध्ये अपेक्षित असलेले काम पूर्ण केले आहे. आणखी पाचशे कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा केली आहे. त्यावर त्यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून निरंतर योजना, जिल्हा नियोजनसह इतर योजनेतून जत येथे ५३३ रोहित्र, आटपाडी ३८० व खानापूर २९० यासाठी ८४ कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. तालुक्यात नवीन सब स्टेशन मागणी आहे. त्यासाठी पवनचक्कीचे तीन सवस्टेशन आहेत. ते शासनाने ताब्यात घेऊन तिथे सब स्टेशन सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जतच्या त्रिभाजनाचा प्रश्न मांडला होता. त्यांनी दांगट समितीसमोर हा प्रस्ताव मांडून त्यानंतर विभाजनाला मंजुरी देण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असल्याचे सांगितले होते. यासाठी लवकरच दांगट समितीची भेट घेऊन जतच्या त्रिभाजनाचा विषय मांडणार आहे, असे आ. पडळकर यांनी सांगितले.

अतिक्रमण केलेल्या २५० कुटुंबांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा वन विभागाकडून दिल्या आहेत. मात्र, वन हक्क समिती कायद्यांतर्गत ही घरे अधिकृत करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या लोकांना राहत्या घरातून बाहेर जावे लागणार नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here