जत : तालुक्यात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई, खरीप पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यावरून जत तालुक्यात सर्वपक्षीय नेते व शेतकरी आक्रमक झाले आहेत. माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जत तालुक्यात यंदा केवळ सात ते आठ इंच पाऊस झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रशासनाने दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनातील प्रमुख मुद्दा म्हैसाळ पाणी योजनेच्या आवर्तनाचा होता. जत तालुक्यातून म्हैसाळ योजनेचे पाणी पुढे जात असतानाही त्याचा लाभ सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांना दिला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जत तालुक्यातील अनेक भाग पाण्यासाठी त्रस्त असताना बाहेरील तालुक्यांना पाणी दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पाण्याअभावी तालुक्यातील तब्बल २७ तलाव कोरडे पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यास पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील तलावांमध्ये सोडण्यासाठी तातडीने आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, तालुक्यात वाढलेल्या अवैध धंद्यांचाही मुद्दा आंदोलनात उपस्थित करण्यात आला. अवैध व्यवसायांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. काही आंदोलक नेत्यांनी या अवैध धंद्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचे गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे आंदोलनाला सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही जोडला गेला आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त केली. जत तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला. सत्ताधारी आमदारांकडूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका आंदोलकांनी केली.
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सर्वपक्षीय नेते, शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत पाणीप्रश्नावर आवाज उठवला. पाणी, चारा आणि खरीप पिकांच्या नुकसानीबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
गावोगावी रास्ता रोकोचा इशारा
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आगामी काळात जत तालुक्यातील गावागावांत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर थेट मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. त्यामुळे प्रशासनासमोर जतच्या पाणीप्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. म्हैसाळ पाणी आवर्तनाबाबत प्रशासन काय निर्णय घेते आणि दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणती मदत मिळते, याकडे जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जतमध्ये रस्ता रोकोप्रकरणी ७० जणांवर गुन्हे
जत : तालुका दुष्काळी जाहीर करावा, यासह विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जत शहरातील महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे विजयपूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
या प्रकरणी पोलिसांनी जतचे दोन माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक, माजी सभापती, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), रासपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सुमारे ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुष्काळी तालुका जाहीर करण्यासह जत तालुक्यातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आंदोलनादरम्यान महामार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जत तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.दरम्यान आंदोलक व पोलीसात बाचाबाची झाली.




