पावसामुळे माळवदी घरांची पडझड ; नुकसान भरपाई देण्याची मागणी

0



सोन्याळ,वार्ताहर : संततधार पावसामुळे जत तालुक्यातील गावामधील माळवदी घरे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाल्याने अनेक  कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा पडझड झालेल्या घरांची पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावे अशी मागणी लकडेवाडीचे माजी सरपंच गजानन भुसनूर यांनी केली आहे.जत तालुक्यात बहुतांश प्रमाणात जुन्या व पारंपरिक पद्धतीने माळवदी घरे बांधण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसाच्यापुढे सलग रिमझिम पाऊस पडत राहिल्यास  घराच्या छतातून पाणी गळायला सुरू होते. सतत पाण्याची गळती चालू राहिल्यास माळवदी घरांची छत व भिंत कोसळून नुकसान होते.   झालेल्या सततच्या पावसादरम्यान सोन्याळ, लकडेवाडी जाडरबोबलाद, माडग्याळ उटगी उमदी शेगाव बनाळी सह बहुसंख्य गावात घरांची पडझड झाली आहे. शिवाय शेतपिकांनाही त्याचा फटका बसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी आहे.घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.सततच्या पावसामुळे खोलगट भागातील शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही शेतात पाणीच पाणी असल्याने उभे पीक पिवळी पडत आहेत.दसरा- दिवाळी सणाचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जत तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे मत गजानन भूसनूर यांनी व्यक्त केले.

सोन्याळ : अशा प्रकारे जत तालुक्यात माळवदी घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.