जत,(प्रतिनिधी): जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला संख मध्यम प्रकल्प तब्बल पंधरा वर्षानंतर भरला आहे.गेल्या दहा दिवसापासून बोर नदी परिसरात होत असलेल्या पावसामुळे आणि रविवारी झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसानंतर या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.यामुळे सांडव्यातृन पाणी बाहेर पडले आहे.15 वर्षांनंतर हे धरण भरत असल्याने पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने संख मध्यम प्रकल्प 1990 साली पूर्ण झाला होता.
त्यानंतर कालव्याची कामे झाली होती. उमदी हद्दीत पाणी सोडण्याची व्यवस्था या प्रकल्पामध्ये आहे.या भागात सातत्याने अवर्षणाचा फटका या तलावाला बसला होता.पाऊसच होत नसल्याने तलावात पाणी येत नव्हते.गत वर्षापासून दमदार पावसामुळे हा भागसह सुखावला आहे.यंदा तलावाच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.
मंगळवारी या भागात ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाल्याने मध्यम प्रकल्पात येणारी बोर नदी दुथडी भरून वाहते आहे.हा तालुक्यातील सर्वात मोठा तलावा भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.





