महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला मंत्र जपण्याची गरज : डॉ.विद्याधर चव्हाण
डफळापूर, वार्ताहर : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जि प शाळा शिंगणापूर ता.जत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नवी दिल्ली, पुणे जिल्हा उपाध्यक्ष,प्रसिद्ध नेचरोथेरपिष्ट डॉ.विद्याधर चव्हाण यांनी महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संकल्पनेवर आधारित स्वास्थावलंबनसाठी स्वावलंबन याविषयावर अतिशय मार्मिक आणि मौलिक विचार मांडले.
पंचमहाभूतापासून बनलेली आपली काया म्हणजेच शरीर,या शरीराची आपण कशी काळजी घेतली पाहिजे,सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या साधनांचा उपयोग करून या रोगाला आपण विनाखर्चिक अगदी सहजरित्या रोखू शकतो,हे त्यांनी उदाहरणासहित पटवून दिले.त्यांनी आहाराचे महत्व सांगताना पाणी खावे आणि अन्न प्यावे याचेही अतिशय विस्तृत विवेचन केले.जगात एकमेव देशात म्हणजेच भारतात असणारे तीन ऋतू,या ऋतूत होणारे आपल्या शरीरातील बदल म्हणजे सर्दी,खोकला,ताप हे मनुष्याचे निरोगी असण्याचे लक्षण आहे.याबद्दलही त्यांनी सुंदर विश्लेषण डॉ.चव्हाण यांनी केले.
यावेळी गावाचे सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अण्णासाहेब पांढरे,उपसरपंच श्री.आण्णासो पांढरे,ग्रामसेवक श्री.भोसले,ग्रामपंचायतीचे सदस्य,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.शाळेतील मुख्याध्यापक श्री.कदम सर,सहशिक्षक श्री.चव्हाण सर,सौ.झाडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन श्री.साळुंखे सर यांनी तर आभार उत्साहळे सर यांनी मानले.