जिल्हाधिकारी,आयुक्त,सिव्हिल सर्जनची बदली करा | खा.संजयकाका पाटील ; जिल्ह्यातील अधिकारी पात्रतेचे नाहीत

0
5




सांगली ; सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अवघ्या दहा दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत.त्यांची हेळसांड होत आहे.याला जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त, सिव्हिल सर्जन, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह सर्वच अधिकारी जबाबदार आहेत.त्यांची तात्काळ बदली करावी,अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.





दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी केंद्र शासनाने एक पथक सांगलीत पाठवावे अशी विनंती केली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 




खासदार पाटील, म्हणाले, जिल्हाधिकारी, आयुक्त, सिव्हिल सर्जन यांच्यासह एकही अधिकारी कोरोना संकटाशी मुकाबला करण्याच्या पात्रतेचे नाहीत.केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत.आकड्यांचा मेळ घातला जात आहे.रुग्ण संख्या वाढली आहे.त्याप्रमाणात यंत्रणा नाही. आहे ती यंत्रणा विस्कळीत झाली आहे. रुग्णालये फुल्ल झाली आहेत.नवीन रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत,याबाबत प्रशासन गंभीर नाही. 




यंत्रणेचा एकमेकांशी समन्वय नाही.आमदार,खासदार,जिल्हापरिषद अध्यक्ष, महापौर,नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. केवळ ‘येस सर, होय सर’असा गोंडा घोळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कोरोनाचा भार टाकण्यात आला आहे.त्यामुळे कोरोना आटोक्यात आणणे मुश्किल झाले आहे. अशा निष्क्रिय जिल्हाधिकारी,आयुक्त, सिव्हिल सर्जन व डीन यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करणे गरजेचे आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here