जत,प्रतिनिधी : शहरासह तालुक्यात पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. असे खड्डे बुजविण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक भागात खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असूनदेखील महापालिका प्रशासन याबाबत सुन्न झाल्याचे दिसत आहे.
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्ड्यांच्या प्रमाणात हमखास वाढ होत असते. त्यामुळे पावसाळा व खड्डे यांचे नाते घट्टच असल्याचे दिसते; मात्र बांधकाम विभागाकडून अनेक प्रयत्न करूनदेखील हे खड्ड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. शहरासह तालुक्यात सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे सध्या बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला; मात्र खड्ड्यांमध्ये टाकलेल्या कचमुळे वेगळाच त्रास सहन करावा लागला. तसेच काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून आले.तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील सर्वच भागांत खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
डागडुजीचे काम निकृष्ट
पावसामुळे खड्डे तयार होण्याच्या प्रमाणात वाढ होत असले तरी असे खड्डे बुजविण्यासाठी देखावा करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभाव खड्डे बुजविताना दिसत आहे. खड्डे बुजवित असताना संबधित विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी नसल्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे ते खड्डे बुजविताना डागडुजीचा मुलामा लावत आहे.
महिनाभरातच रस्त्यांची दुरवस्था
शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील रस्त्याची झालेली आवस्था





