मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता हरपला,आमदार विनायक मेटे यांचे निधन

0
11
कवठेमहांकाळ: मराठा समाज आणि मराठा आरक्षण यासाठी रात्रंदिवस झटणारे समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाई करणारे नेते,शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे.
राजकारण कळायला सुरूवात झाल्यापासून ते वयाच्या ५२ वर्षांपर्यंत संघर्ष करणाऱ्या विनायक मेटे यांचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा प्रवास मोठा होता.रविवारी पहाटे  मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि मराठा समाजाचा बुलंद आवाज थांबला.३० जून १९७० रोजी सामान्य कुटूंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी पाच वेळा विधानपरिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता.केज)या खेडेगावचे ते रहिवाशी होते.त्यांनी व्यवसाय निमित्त मुंबई गाठली.यावेळी मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला आणि यातूनच त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली.पहिल्या युती सरकारच्या काळात म्हणजे १९९५ साली त्यांना विधान परिषदेवर पहिल्यांदा संधी मिळाली.दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली.पुढच्या काही काळात विनायक मेटे यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध आले.त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला.त्यानंतर राष्ट्रवादीचे त्यांना उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी देण्यात आली.
मागच्या लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली.पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण केली.आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आहेत.विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली, यानंतर त्यांनी राज्यासह बीड जिल्ह्यात मोठा जनसंपर्क केला होता.मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही घटना असेल तर त्यांच्याशी ते जोडली जायचे.मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत.अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.मराठा आरक्षण,मुस्लिम आरक्षण,स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख,दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे,दिवंगत गोविंदभाई श्रॉफ आदींचा गौरव करण्यात आला आहे.त्यांच्या या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून मराठा समाजाचा आवाज हरपल्याची भावना लोकतून व्यक्त होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here