डफळापूर जिल्हा परिषद गट तसेच डफळापूर व बाज पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या डफळापूर जिल्हा परिषदेसाठी सौ. स्वप्नाली मनोज मासाळ, बाज पंचायत समितीसाठी सौ. मनीषा भाऊसाहेब दुधाळ तसेच डफळापूर पंचायत समितीसाठी महेश अशोकराव गावडे या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व सांगली बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण यांनी केले. डफळापूर परिसरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण म्हणाले की, देशात व राज्यात सर्वांगीण विकासाची घोडदौड भाजपच्या नेतृत्वाखालीच सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी व युवकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहे. डफळापूर तालुक्यासह परिसराचा विकास अधिक गतीने करायचा असेल तर भाजप हाच एकमेव सक्षम पर्याय आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
डफळापूर गटातील भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे खेचून आणली जातील. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, शाळा दुरुस्ती, ग्रामविकास आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी प्रभावीपणे काम करतील. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही आमिषाला किंवा अफवांना बळी न पडता कमळाच्या चिन्हासमोरचे बटन दाबून भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, रस्ते विकास योजना, महिलांसाठी स्वयंसहायता गटांना मिळणारे प्रोत्साहन यांचा उल्लेख करत या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
सभेला ग्रामस्थ, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी “विकासासाठी भाजप, विश्वासासाठी भाजप” असा नारा देत डफळापूर गटातील तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.




