साळमळगेवाडी ते खिलारवाडी रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील साळमळगेवाडी ते खिलारवाडी रस्त्याची अवस्था दयनिय झाली असून या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. साळमळगेवाडी ते खिलारवाडी या दरम्यान रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.त्याशिवाय रिमझिम पावसाने संपूर्ण रस्ताच घसरगुंडी बनत आहे.यामुळे झालेल्या अपघातात यापुर्वी जीव गमविल्याचे प्रकार घडले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

खिलारवाडीचा हा मार्ग अत्यंत वर्दळीचा व महत्वपुर्ण मार्ग असून तालुक्यातील नागरिकांना दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, अपघातात वाढ होवून मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्त्याची तातडीने सुधारणा करण्यात यावी व जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत या भागातील लोकांकडून कोणतीही करवसूली करण्यांत येवू नये अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
अन्यथा या परिसरातील नागरिक धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे सदर निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणावीस,बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
