जिंदगी ना मिलेगी दोबारा..आनंदाने जगा | वसंत हंकारे : विवेकानंद स्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न
डफळापूर वार्ताहर : जगात प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात दुःख असून त्यासाठी रडत न बसता हसत हसत जीवन जगण्याची गरज आहे,जिंदगी ना मिलेगी दोबारा…आनंदाने जगा असे मत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.ते डफळापूर येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूल येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात बोलत होते.यावेळी हंकारे यांचा सत्कार संरपच बालिकाकी चव्हाण व उपसंरपच प्रताप चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संस्थापक परशुराम चव्हाण सर,ग्रामपंचायतीचे सदस्य,संस्थेचे संचालक व मोठ्या संख्येने महिला,पुरूष पालकवर्ग उपस्थित होते. या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिला,पुरूषासाठी स्पर्धा घेण्यात आली.त्यात मानाची नथ विजया शेळके यांना तर प्रविण कोष्ठी यांना मानाचा फेटा मिळाला. हंकारे पुढे म्हणाले,मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनीअर झाला नाही तरी चालेल, पण तो सुजाण नागरिक झाला पाहिजे. लहान मुलांवर लादली जाणारी बंधने घातक आहेत. मुलांवरील संस्कार चांगले झाले पाहिजेत. संस्कार हा विषय खूप महत्वाचा आहे. शाळेमध्ये असणार्या पालक मिटींगला पालकांनी उपस्थित राहिले पाहिजे.आयुष्यात खूप धमाल आहे. फक्त आपण जगायला शिकले पाहिजे. जीवनामध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.चांगल्या कर्तृत्वाचे व्यसन असले पाहिजे की ज्यामुळे आई वडीलांची मान उंचावली पाहिजे. आईचा आशीर्वाद कायम पाठीशी असला पाहिजे. तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. जग जवळ आले पण माणस दूर जाऊ लागली आहेत.ज्या मुलाला आपल्या घरातील माता-पिता समजले नाहीत, त्याचे कर्तृत्व व शिक्षण शून्य आहे. त्याने डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा प्रथम माणूस बनले पाहिजे. त्याने असे कुठलेच काम करू नये,की ज्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल. भारतातले वृद्धाश्रम बंद होतील तेव्हाच भारत महासत्ता बनेल,असा विश्वास व्याख्याते वसंत हंकारे यांनी येथे व्यक्त केला.

ते म्हणाले,’आजकाल माणुसकी हरवत चालली आहे.आपल्या मुलांना घडवा, त्यांना जपा हीच तुमची संपत्ती आहे. मुलांनी देखील आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असे वागू नये.माणुसकी हीच खरी संपत्ती असून,तिची जपवणूक करा असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.