जत,प्रतिनिधी:दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले. नागरिकांनी खरेदीसाठी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, विद्युत रोषणाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः मंगळवार पेठेतील रस्त्यावरील विविध दुकानांमध्ये सोमवार व मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडाली होती.खासगी आणि शासकीय कार्यालयांना मंगळवारपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा गावाकडे जाणार्या नागरिकांनी एसटी स्थानके, बसस्थानकावर गर्दी केली होती. त्यापूर्वी खरेदीसाठी विविध ठिकाणी गर्दीचा महापूर आला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने, नवीन वाहने खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले होते. तर मिठाई, पेढ्यांच्या दुकानांसह आकर्षक गिफ्ट वस्तूंच्या दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी दिसून आली. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त शहरातील नागरिकांनी रविवारपासून गावी जाण्यास प्राधान्य दिल्याने गर्दी कमी झाली होती.
नरक चतुर्थी उत्साहात
भागवत पुराणातील कथेनुसार नरकचतुर्थीला भगवान श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकारसूर हा अत्याचारी दानव होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा कृष्णाने प्रहार केला, तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण त्यास वर दिला,नरक चतुर्दशीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, ताला नरकयातना भोगाव्या लागणार नाहीत. तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल…..पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नाची प्रथा रूढ झाली असल्याची आख्यायिका आहे.
अभ्यंगस्नानाचे महत्त्व
दिवाळीच्या नरकचतुर्थीला अभ्यंगस्नानाच्या पद्धती अनेक कुटुंबात वेगवेगळ्या आहेत. व्यक्तीला पाटावर बसवून शरीराला सुगंधी तेलाचे मालीश केले जाते.अंघोळीनंतर कपाळाला कुंकुंमतिलक लावून ओवाळले जाते. दरम्यान, उटण्यामधील मिश्रण पद्धतीने बनविलेले असते. त्यामध्ये शिकाकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळस पाने आणि थोडासा कापूर मिसळलेला असतो.
जत शहरातील मुख्य पेठेत मंगळवारी दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी होती.





