चित्रपट ” भय “, इथले संपत नाही,,,
भय, भीती, या शब्दांची ” भीती ” एकदा मनाने घेतली कि त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडून जाते. ” भित्यापाठी ब्रह्मराक्षस ” म्हणतात तशी स्थिती होते. त्यामुळे बारीक–सारीक गोष्टीमध्ये त्याला भीती वाटू लागते, अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित निर्माते सचिन कटारनवरे यांनी ” भय ” चित्रपटाची निर्मिती ५ जी इंटरनॅशनल या चित्रसंस्थे तर्फे केली असून सहनिर्माते अनिल साबळे हे आहेत. कथा–पटकथा–संवाद नितीन सुपेकर यांचे असून संकलन आणि दिगदर्शन राहुल भातणकर यांनी केलं आहे. संगीत विक्रम मॉन्टरोज यांचे असून छायाचित्रण राजेश राठोरे यांचे आहे, ह्या मध्ये अभिजित खांडकेकर,स्मिता गोंदकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, निनित शर्मा, शेखर शुक्ला, सिद्धार्थ बोडके, संस्कृती बालगुडे, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवडकर, दीप्ती प्रकाश, अनघा जोशी, मीनल सिन्हा, असे अनेक कलाकार असून प्रत्येकानी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.
हि कथा आहे गोकुळ जोशी आणि मीरा जोशी या मध्यवर्ती कुटुंबाची, गोकुळ आणि मीरा हे सर्वसामान्य जोडपे, आपले काम बरे कि आपण बरे असे त्यांचे जीवनमान आहे. असे असलेतरी गोकुळ हा एका विचित्र मानसिक रोगाने पछाडलेला असून त्याला आजूबाजूची परिस्थिती, गुंडगिरी, दहशदवाद, भ्रष्टाचार यांची त्याला कमालीची भीती वाटत असते. त्यामुळे तो आयुष्यात काहीच करण्याच्या मनस्थितीत नसतो.त्याच्या मनांत एका विचित्र भीतीने घर केल्याने तो सदैव भयभीत अवस्थेत वावरत असतो, तो गिझर लावायला घाबरतो कारण त्याला शॉक लागेल अशी भीती असते, बुटामध्ये साप–विंचू आहेत असे वाटत असते, ट्रेनला अपघात होईल म्हणून तो ट्रेन ने प्रवास करीत नाही. ह्या त्याच्या वागण्याने त्याची बायको मीरा हि खूप त्रासलेली असून तिला दिवस गेलेले असल्याने तिला आपल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा काळजी वाटत असते. ती डॉक्टरांना भेटते आणि गोकुळ ला नक्की काय झाले आहे हे जाणून घेते. डॉक्टर सांगतात कि गोकुळ हा ” फिझोफेनिया ” ह्या आजाराने ग्रासलेला असून त्याला मागील काही घटना सतत दिसतात, त्यामुळे तो अधिक भयग्रस्थ होतो. मागे घडलेल्या गोष्टी आठवल्या कि तो अधिक घाबरतो त्यामुळे तो स्वतःला सुरक्षित समजत नाही.
एक दिवस त्याच्या समोर शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर ह्यांची हत्या कुप्रसिद्ध गुंड भरत टांगे यांनी केलेली असते, त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार गोकुळ असतो, त्या घटने पासून तो स्वतःला सुरक्षित नाही असे समजायला लागतो, कोणीतरी आपल्या विरोधात षडयंत्र रचित आहे असे त्याला सतत वाटू लागते, तो सर्वांच्याकडे संशयाने पाहायला लागतो, आणि एक दिवस त्या बिल्डरच्या खुनाच्या शोधात असलेले इन्स्पेक्टर त्याच्या घरी येतात, तो कमालीचा घाबरतो, त्याच्या हातून भयंकर चुका होतात, गोकुळच्या भित्रेपणामुळे मीराला घरीच अपघात होतो, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. आणि त्याच्या शेवट काय होतो हे तुम्ही सिनेमात पहा. मीरा जोशी बरी होते का ? गोकुळ त्याच्या आजारातून मुक्त होतो का ? त्या बिल्डरचा खुनी सापडतो का ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे सिनेमात दडलेली आहेत,
अभिजित खांडकेकर यांनी गोकुळ ची भूमिका रंगवली असून त्यामधील बारकावे दाखवले आहेत, स्मिता गोंदकर हिने मीरा ची भूमिका मनापासून साकारलेली आहे. सोबत उदय टिकेकर, सतीश राजवाडे,विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, नुपूर दुधवाडकर, शेखर शुक्ला, सिद्धार्थ बोडके, यांनी साथ दिलेली आहे. कथाकल्पना चांगली असून ती पटकथेमध्ये मांडताना गोंधळ उडालेला जाणवतो, पटकथा करताना अधिक मेहनत घेणे जरुरीचे होते असे जाणवते, सुरवातीला सिनेमा पकड घेत नाही पण नंतर गती आणलेली आहे. संकलन – दिगदर्शन राहुल भातणकर यांनी ठीक केले आहे, एकंदरीत सिनेमा ठीक आहे. शेवटी प्रेक्षकच ठरवतील.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७