चित्रपट : थँक्यू विठ्ठला ,,
चित्रपट : थँक्यू विठ्ठला ,,
“”” पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, मदत करी विठ्ठल, आपणासी “” प्रत्येक माणसाला आपण कोणीतरी मोठे बनावे, सध्या जे आपण जीवन जगत आहोत त्यापेक्षा काहीतरी वेगळं जीवन आपल्या वाटयाला यावे, दुसऱ्याकडे खूप आहे माझ्याकडे त्या व्यक्तीसारखं काहीच नाही, हि खंत करीत असताना, दुसऱ्या व्यक्तीला लाभलेलं जीवन त्याच्या सारखे सुख आपणालाही लाभावं अशी इच्छा सर्वसामान्य माणसाच्या मनांत येते, आणि त्याच्या सारखे जीवन आपणाला जगता येईल कां ? या आणि अश्या अनेक कल्पनेवर आधारित थँक्यू विठ्ठला ची निर्मिती एम. जी. के प्रोडक्शन यांनी केली असून निर्माते गोवर्धन नारायण काळे, गौरव गोवर्धन काळे, अंजली सिंग, यांनी केली आहे. कथा / दिगदर्शन देवेंद्र शिवाजी जाधव यांचे असून सहनिर्माता आणि पटकथा एम. सलीम यांची आहे. छायाचित्रण दिनेश सिंग,संगीत रोहन–रोहन यांचे असून या मध्ये महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसमी तोंडवळकर, स्मिता शेवाळे ओदक, पूर्वी भावे, दीपक शिर्के, जयवंत वाडकर, अरुण घाडीगावकर, मिलिंद सफाई, इत्यादी कलाकार आहेत.
हरीभाऊ हा एक सर्वसामान्य गरीब माणूस, डबेवाला, घरोघरी टिफीनचे डबे पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असतो, हे डबे एका कॉर्पोरेट कंपनी मध्ये पोहोचविताना त्याची वर्दे साहेबांची गाठ पडते, कंपनीला नफा झाल्याने ते बोनस जाहीर करतात, त्यांची श्रीमंती पाहून हरीभाऊला सुद्धा आपले जीवन त्यांच्या सारखे असावे असे वाटते, हरीच्या घरी मुलाची फी भरायला पैसे नसतात, त्यामुळे घरी चिडचिड–कटकटी सुरु असतात, आपल्याला मिळालेल्या जीवनाची दाद मागायला तो विठ्ठलाच्या मंदिरात जातो, आणि आश्चर्य म्हणजे विठ्ठल त्याला भेटतो, हरी त्याला सगळी हकीगत सांगतो,विठ्ठल त्याला समजावताना सांगतात कि, तुझा हाच प्रश्न आहे ना कि सगळ्यांना सगळी सुखं का दिली नाहीत, गरीब / श्रीमंत हा भेद तुम्ही केला, जन्माला येताना सगळे सारखेच जन्माला येतात,नशिबाला कर्तृत्वाची जोड द्यावी लागते, तुमच्या पूर्वजन्मीचं कर्म या जन्मीचं प्राक्तन असतं, तुझा आतताईपणा तुझा एक दिवस घात करणार आहे, जो पर्यंत तुझा संयम वाढत नाही तो पर्यंत तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस,
हरीभाऊंच्या विनंती वरून विठ्ठल त्याला वर्दे बनवताना सांगतो कि तुझा विवेक आणि चेहरा जरी तोच असला तरी लोकांना तू वर्दे म्हणूनच दिसणार आहेस, हरीभाऊ वर्दे बनतात पण त्यांच्या आयुष्यात सुख / समाधान मिळत नाही, काही घटनांच्यामुळे तो आत्महत्या करायला निघतो पण तेथे विठ्ठल सामोरा येतो, हरीभाऊ त्याला सांगतो पैश्याने माणसं मॅनेज करता येतात, मला मंत्री बनायचं आहे, मला कृषी खातं दे मी विकास करून दाखवतो पण तेही त्याला जमत नाही तो आणखी गडबड करून ठेवतो, कृषी मंत्र्यांचं आयुष्य जगत असताना त्याचे पाप – पुण्य हि हरीभाऊच्याच माथी येते आणि एक दिवस त्याला घेऊन जायला यमदेव आपल्या दूता सह येतात त्यावेळी हरीभाऊ मला ह्या मंत्र्यांच्या आयुष्यातून बाहेर काढा अशी विनंती करतो, तो म्हणतो देवांचं आयुष्यच हेच खरं आयुष्य आहे मला आता यमदेव बनवा, विठ्ठल त्याची इच्छा पूर्ण करताना सांगतो कि हि तुझी शेवटची संधी आहे, हरीभाऊ आपले माणूसपण विसरत नाही, देव आणि मानव यातला फरक तो समजून घेत नाही, चुका होतात,,, शेवटी त्याला सुख मिळते का ? हरीभाऊंच्या आयुष्यात कोणते जीवन तो श्रेष्ठ मानतो ? वेगवेगळ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा जगत असताना हरीभाऊला कोणता बोध होतो ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे ह्या सिनेमात मिळतील.
या सिनेमात महेश मांजरेकर यांनी विठ्ठलाची भूमिका समर्थपणे पेलली आहे. मकरंद अनासपुरे यांनी हरीभाऊ साकारतांना वेगवेगळ्या चार भूमिका सादर करून त्याला न्याय दिलेला आहे. सोबतीला मौसमी तोंडवळकर, वरद सरंबेळकर, दीपक शिर्के, मिलिंद सफाई, अरुण घाडीगावकर, जयवंत वाडकर, अभिजित चव्हाण, असे अनेक कलाकारांनी आपल्या भूमिका व्यवस्थित साकारल्या आहेत, देवेंद्र जाधव यांनी या चित्रपटाचे दिगदर्शन केलं आहे.
सुखाच्या शोधात निघालेल्या हरीभाऊला चार वेगवेगळे जीवन जगावे लागते, विठ्ठल सांगतो कि, वाळवंटात मृगजळ तू शोधत आहेस, पण तो असतो फक्त आभास, पैश्यामुळे माणूस वरपर्यंत पोहोचतो का? या जगातून जाताना तो काहीही वर घेऊन जात नाही, फक्त त्याच्या कर्माची फळं त्याच्या सोबत येतात, आणि कर्मामुळे निर्माण झालेलं पुण्य त्याला संकटात मदत करतं, समाधान / सुख हे आपल्या मानण्यावर आहे. असा संदेश जाताजाता हा सिनेमा देऊन जातो.
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७