बाजारात दिवाळीचा उत्साह नाही ग्रामपंचायत निवडणुका,रब्बी हंगामाचा परिणाम;गतवर्षाच्या तुलनेत डाळीचे दर कमी
बाजारात दिवाळीचा उत्साह नाही
ग्रामपंचायत निवडणुका,रब्बी हंगामाचा परिणाम;गतवर्षाच्या तुलनेत डाळीचे दर कमी
जत,(प्रतिनिधी)-
ग्रामपंचायत निवडणुका, रब्बीचा हंगाम,बाजारातील मंदी यांचा मोठा परिणाम बाजारावर दिसून येत असून फारशी उलाढाल झाली नसल्याचे किराणा दुकानदार, स्टेशनरी दुकानदार आणि व्यापारी सांगत आहेत.साखर, तेल,डाळीचे दर कमी होऊनही खरेदीसाठी बाजारात गर्दी कमीच आहे. दोन दिवसांत उमेदवार पावला तर दोन दिवसांत गर्दी होऊ शकेल, असे सांगण्यात आले.
जत तालुक्यात सगळ्यात जास्त म्हणजे 78 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका सुरू आहेत. सोमवारी मतदान आणि मंगळवार मोजणी असल्याने बहुतांश लोक अजून निवडणुकीच्या वातावरणातच मश्गुल आहेत. शिवाय जत तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला आहे. खरिप हातचा गेला आहे,मात्र रब्बी हमखास हाताला लागणार अशी चिन्हे असल्याने काही भागात पेरण्या, शेतीची कामे सुरू आहेत. सरकारी कर्मचारीदेखील निवडणूक कामात असल्याने त्यांनाही मंगळवार नंतरच मोकळीक मिळणार आहे. शाळांना सुट्ट्या दि. 14 पासून लागल्या आहेत.दिवाळी जवळ आली असली तरी सगळे आपापल्या कामात गुंतल्याने दिवाळी साजरी करायला लोकांना सवडच नाही.
शनिवारी रात्री निवडणुकीचा प्रचार संपला आहे.रविवार आणि सोमवार उमेदवार पावतात का याची वाट मतदार पाहात आहेत. त्यानुसार लोकांची हालचाल सुरू राहणार आहे. तसे झाले तर दोन दिवस बाजारात लोकांची गर्दी होईल, मात्र सध्यातरी म्हणावा उत्साह नाही ,असे किराणा दुकानदार दीपक पवार यांनी सांगितले. शेतकर्यांना कर्जमाफी मिळेल, अशी मोठी अपेक्षा होती.मात्र तीही मिळाली नाही.त्यामुळे वातावरण पाहूनच दिवाळी साजरी होणार असे सध्या तरी चित्र आहे. बाजारात आकाशदिवे, किल्यावरची खेळणी, रांगोळ्यांचे स्टॉल्स यामुळे किमान दिवाळीचे वातावरण तरी तयार झाले आहे. कापड विक्रेत्यांनी 50 टक्के तरी व्यापार होईल की नाही अशी शंका व्यक्त केली आहे.