जत,संकेत टाइम्स : येथील मंडईमध्ये मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक हैराण झाले आहेत. गत काही दिवसांत मंडई तसेच मुख्य मार्गावरून अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. महागड्या मोबाईलधारकांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यातही दिली आहे. मात्र, कमी किमतीचा मोबाईल चोरीस गेलेले नागरिक याबाबत कोठेही वाच्यता करीत नाहीत.
मोबाईल चोरीमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असण्याची शक्यता आहे. मंडईत होणारी गर्दी व मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण याचा विचार करून पोलिसांनी याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शहरात मंडईबरोबरच अनेेेक चौकात नेहमीच ग्राहकांची व नागरिकांची गर्दी असते. त्या गर्दीचा नेहमी चोरट्यांकडून फायदा घेतला जातो. या परिसरात पोलीस अधिकारी असून देखील चोरटे चोरी करत आहेत.
नियोजित पोलीस चौकीची गरज
जत शहरातील हनुमान मंदिराजवळ येथे पोलीस चौकी प्रस्तावित आहे. मात्र, अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. सध्या जत पोलीस ठाण्यातील तीन ते चार कर्मचारी या विभागात लक्ष ठेऊन असतात. मात्र, शहराचा आवाका पाहता त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत असून या विभागात पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे. तसेच चोरीच्या वाढत्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा अज्ञात चोरट्यांवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांना गजाआड करावे, अशी मागणी होत आहे.