ऊस आणि दुधाला दर मिळाला पाहिजे,महाविकास आघाडीच्या या नेत्याने जतमध्ये केली मागणी

0
जत,संकेत‌ टाइम्स : जत तालुक्यातील काही भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे.वास्तविक युती सरकारच्या काळात या योजनेला सुरवात झाली.ऊस उत्पादन वाढले आहे.दुधाचेही उत्पादन वाढले आहे.मात्र ऊस आणि दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे ही रास्तच मागणी आहे.ही मागणी जिल्हा प्रशासनाने सोडविली पाहिजे.सध्या ऊसतोडणी यंत्राद्वारे केली जाते,त्यामुळे त्याची रक्कम ३ ते ४ टक्के कपात केली जाते.हा मुद्दा सुद्धा येथून पुढच्या आंदोलनात घ्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संजीवकुमार सावंत हे झगडत असून त्यांना यापुढील काळात जिल्हातील शिवसेनेची ताकद देऊ असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस व दुधाला योग्य दर व भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेने आज सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण व मोर्चा काढला.मोर्चाची सुरुवात जत बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.गुहागर- विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरून,मंगळवार पेठ,वाचनालय चौक ते राम मंदिर,ग्रामीण रुग्णालयसमोरून जत तहसील कार्यालयाकडे मोर्चा  गेल्यानंतर तेथे सभा झाली.याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख पाटील बोलत होते.
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की,जत तालुक्यात सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.त्याचबरोबर दूध उत्पादनही वाढत आहे.मात्र ऊसाला एकसमान जिल्ह्यात दर नाही.यासाठी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित आले पाहिजे. दराबाबत दुजाभाव करणाऱ्या यंत्रणेला जाब विचारला पाहिजे.गप्प बसाल तर न्याय मिळणार नाही.येथून पुढे ऊसतोडणीसाठी पैसे दिले जाणार नाहीत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे.आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद गाडले पाहिजेत.सर्वजण एकत्रित आल्यास येथून पुढच्या काळात जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जरूर न्याय मिळेल असा विश्वास शेवटी खराडे यांनी व्यक्त केला.
      मोर्चाचे संयोजक शिवसेनेचे तालुका प्रमुख (पश्चिम विभाग)संजीवकुमार सावंत म्हणाले की,सधन भागात ऊसाला दर वेगळा,दुधाला दर वेगळा आणि आमच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दर वेगळा  हे असले प्रकार इथून पुढच्या काळात खपवून घेतले जाणार नाहीत.हा आमचा वाद शासनाशी नसून जिल्हा प्रशासनाशी आहे.त्यामुळे त्यांनी त्यातून मार्ग काढावा अन्यथा यापुढील काळात आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल असा इशारा शेवटी सावंत यांनी दिला.
      अँड.प्रभाकर जाधव,जत तालुका शिवसेना प्रमुख संजीवकुमार सावंत,तालुका संघटक अमित दुधाळ,जत तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,प्रहार संघटनेचे सुनील बागडे,महादेव हुचगोंड,मोहन गायकवाड,आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष दरेश्वर चौगुले ,भरत गुळवे,यशवंत कोळेकर,आदींनी मनोगत व्यक्त केले.
         तर जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत ,माणिक पाटील,वाहतूक सेनेचे विठ्ठल कोळी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश माळी,सुरेश घागरे,युवा सेनेचे सचिन मदने,ज्ञानेश्वर धुमाळ,रोहित पाचंगे,विक्रांत पाचंगे,पप्पू परीट,सज्जन सावंत,महेश यादव,बी आर सावंत  आदींची उपस्थिती होती.लाक्षणिक उपोषणाची सांगता झाल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.सुत्रसंचालन इराणा पाचंगे यांनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.