आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा प्रशासनाला विसर
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला व त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. त्यामुळे शासकीय सभा समारंभ बंद झाले. परंतु अनेक राजकीय फोटो, पुतळे, भूमिपूजन व उद्घाटन समारंभाच्या कोनशिला फलक अद्याप उघडेच असल्यामुळे प्रशासनालाच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर पडला की काय, अशी चर्चा जत तालुक्यात येथे रंगली आहे.
निवडणूका जाहीर होऊनही अनेक गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन कोनशिला, सभामंडप व पथदिव्यांवरील विविध राजकीय नेत्यांचे फलक उघडेच आहेत. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अकरा तारखेपासूनच होणे अपेक्षित आहे. परंतु आजपर्यंत हे सर्व फलक उघडेच आहेत.याकडे ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा या गोष्टींकडे कानाडोळा झाल्याचे दिसते. त्यामुळे आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीनुसार हे फलक झाकले जाणे अपेक्षित आहे.

सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे. जत तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आचारसंहिता कक्ष सुरू झाला असून तालुक्यात कोठेही असे फलक उघडे असल्यास त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल.
-सचिन पाटील, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी