डफळापूर,वार्ताहर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून पुरविण्यात येत असलेल्या सेवेतील अडथळ्याची शर्यत डोकेदुखी ठरत असल्याने बहुतांश ग्राहक बीएसएनएलपासून लांब गेले आहे.कंपनीची करोडो रुपयाची यंत्रणा आता धूळ खात पडली आहे.
ऑक्टोबर 2000 मध्ये स्थापन झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी होती. ग्रामीण भागासह बहुतांश ग्राहक या कंपनीच्या सेवेवर अवलंबून होते.करोडो रुपये खर्च करुन बीएसएनएलने आपली अध्यावत यंत्रणा शहरात उभारली. अभियंत्यापासून कर्मचारी येथे कार्यरत होते. परंतु कालांतराने खासगी कंपन्यानी या क्षेत्रात प्रवेश केला आणि बीएसएनएलसमोर आव्हान उभे केले. तरीही दूरसंचार क्षेत्रातील ही सरकारी कंपनी तग धरून होती.कालांतराने इंटरनेट आणि दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलची अडथळ्याची मालिका सुरु झाली.
पैशाचा भरणा करुनही या सरकारी कंपनीच्या अडथड्याच्या सेवेला ग्राहक कंटाळू लागले.
तक्रारी देऊनही सेवा मिळत नसल्याने ग्राहक खासगी कंपनीकडे वळू लागले. आता तर ही कंपनी शेवटची घटका मोजत असून बहुतांश ग्राहकांनी कंपनीला रामराम ठोकला आहे. ग्राहकच नसल्याने येथील कार्यालयाला कुलुप ठोकले आहे.कंपनी घाट्यात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक घाटा कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली. त्यामुळे आता कर्मचाऱ्याअभावी कामकाज ढेपाळले आहे. बीएसएनएलची भव्य इमारत डफळापूर शहरात असून कर्मचारी व ग्राहकाअभावी करोडो रुपयाची यंत्रना धुळखात पडून आहे.
कर्मचाऱ्याअभावी येथील कार्यालयाचा भार जत कार्यालयाकडे सोपविण्यात आला आहे. येेेथे कर्मचारी नेमणूक आहे का? नेमके कोणत्या ठिकाणी कार्यरत असतात, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. सध्यातरी येथील कार्यालय रामभरोसेच आहे.