संख (रियाज जमादार)
जत तालुक्यातील लवंगा येथे मुले पळवणारी चोरांची टोळी असल्याच्या गैरसमजूतीतून चौघा साधूंना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.उत्तर प्रदेशमधील चार साधू लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना मुले पळवणारी चोर समजून ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे.सांधूनी कोणतीही तक्रार केली नसल्याने पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही.
उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.यावेळी लवंगा या गावी चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा गैरसमज झाला. ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला.
यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता,या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखड्याचे साधू असल्याचं समोर आलं आणि खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर या साधुनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितले. या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही,अशी माहिती उमदी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दिली. तर चौकशीनंतर साधूंनी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी रवाना झाले. सदर या घटनास्थळी रात्री ११ वाजता जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकार नवले व उमदीचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व पोलीस यांनी रात्री उशीरा पर्यंत लवंगा येथे चौकशी केली.




