जत : कमी झालेला पाऊस, कोयना धरणातील अपुरा पाणीसाठा आणि रखडलेली विस्तारित म्हैसाळ योजना या तिन्ही बाबी जतसाठी मोठ्या चिंतेचा विषय होऊन बसल्या आहेत. उत्तर कर्नाटक भागातील गावांना पाण्याची समस्या असताना सन २०१६ पासून आजअखेर कोयनेतून ६.८६ टीएमसीसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याच्या बदल्यात पाणी या करारान्वये कर्नाटक सरकारने देखील तूबची बबलेश्वर द्वारे जतच्या पूर्व भागातील गावांकरिता पाणी द्यावे,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.
तसा प्रस्ताव ही पाटबंधारे विभागाने शासनाकडे दिला असून यावर वेळीच निर्णय झाल्यास जतकरांना दिलासा मिळणार आहे.
म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम पूर्ण व्हायला किमान २ वर्षांहून अधिकचा काळ लागणार आहे. त्यामुळे तूबची बबलेश्वर द्वारे कर्नाटकातून येणारे पाणी हक्काने आले तर दुष्काळग्रस्त जत ला टंचाईच्या झळा कमी बसतील. याकरिता महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेऊन माझ्या जतच्या नागरिकांना न्याय द्यावा,असे आवाहनही आ.सावंत यांनी केले.




