जत तालुक्यातील संख येथील अपर तहसीलदार कार्यालय इतरत्र हलवण्याच्या शासनाच्या हालचालीं विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला आहे. गुरूवारी हजारो नागरिकांच्या सहभागातून छत्रपती महाराज चौकातून अप्पर तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रभारी अपर तहसीलदार जितेंद्र मोरे यांना निवेदन देत ही हालचाल तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली.
संख हे जत तालुक्याच्या पूर्व भागातील प्रमुख आणि मोठे गाव असून येथे एमएससीबीचे मोठे कार्यालय, प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटबंधारे विभाग यांसह अनेक सरकारी विभाग सुरू करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. त्यामुळे संख तालुका घोषित करणे गरजेचे असताना विद्यमान कार्यालये इतरत्र हलवण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांच्या नाराजीचे कारण ठरला आहे.
मोर्चात संख व आसपासच्या गावांतील नागरिकांनी कोणताही पक्षीय भेद न ठेवता मोठ्या संख्येने सहभाग घेतला व घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.अपर तहसीलदार कार्यालय कायम अबाधित ठेवावे आणि विभाजनाचा प्रस्ताव रद्द करावा.संख तालुका तातडीने मंजूर करावा.संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे.संख येथे बस स्थानक व एस.टी. डेपो स्थापन करावा.कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे.भूमिअभिलेख कार्यालय तातडीने सुरू करावे.संख येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करावे.
मोर्चादरम्यान सुव्यवस्थेसाठी उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड एस. टी., पोलीस उपनिरीक्षक साळवे बी.सी.आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते.
ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट असून, संखची प्रमुख प्रशासकीय कार्यालये हलवण्याचा कोणताही निर्णय स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संख येथील अप्पर तहसील कार्यालय इतत्र हलविण्याला विरोध करत संखकरांनी भव्य मोर्चा काढला.




