जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील खड्डे वेगळे आहेत.तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर अधूनमधून खड्डे पडतात. ते बुजविले जातात. पावसाळा आला की मात्र गोष्ट वेगळी असते.एकाच धुंवाधार पावसाने रस्त्यांवरील धूळ निघून जाते. दुसऱ्या पावसाने खड्यामध्ये भरलेला मुरूम आणि डांबर बाहेर येऊ लागते.त्यात जीवघेणे खड्ड्याची मालिका तयार होते.त्यात पाऊस दररोज पडत राहिला, तर मात्र खड्डे मोठे व्हायला लागतात.
चार पाच दिवसांच्या पावसाने हे खड्डे चांगले मोठे होऊ लागतात. रस्त्यांवर खड्डे पडले की आरडाओरडा सुरू होतो.पावसाळा संपेपर्यंत असाच खेळ सुरू राहतो.त्यानंतर तातडीने निविदा निघतात.तालुक्यातील रस्त्यासह शहरातील रस्त्यांवर डांबरमिश्रीत खडीचे थरच्या थर चढविले जातात. खड्डे गायब होतात. चर्चा थांबते. अर्थात हे खड्डे कायम स्वरूपी कधीच गायब होत नाहीत; कारण डांबराचे थर चढविताने कधीच लेव्हलमध्ये आणली जात नाहीत. कधी ती रस्त्याच्या पातळीच्या खाली असतात तर कधी वर. त्यामुळे खड्ड्यांचा अनुभव अधून मधून येतच राहतो. त्याशिवाय वीज कंपनी, टेलिफोन कंपन्या आणि पालिकेचे पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभाग अधूनमधून रस्ते खणतच असतात. बरे हे खड्डे एका बाजूला नसतात, तर संपूर्ण रुंदीत असतात. त्यावर कधी तरी खडी टाकली जाते; पण हे खड्डे रस्त्यावरील स्मूथ राइडचा अनुभव कायमचा किरकिरा करून टाकतात.गेले दोन वर्षे पाऊस कमी पडला. गेल्या वर्षी तर खूपच कमी पडला.
त्यामुळे जतच्या रस्त्यांवर फार मोठे खड्डे पडले नाहीत. दुष्काळाचा असाही फायदा; पण त्याचा फटका आता बसतो आहे. कारण या कालावधीमध्ये रस्त्यांकडे पाहिजे तसे लक्षच दिले गेले नाही. या रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्ती हवी तशी झाली नाही. यंदा मात्र पावसाने विश्रांतीच घेतली नाही आणि बघता बघता जत शहर खड्ड्यात गेले.हे असे का होते? हे खरोखरच घडते की जाणीवपूर्वक घडविले जाते? अनेक देशांमध्ये रोज पाऊस पडतो, पण तिथले रस्त्यांवर कधीच खड्डे पडत नाहीत; मग आपल्या शहरातील रस्त्यावर एवढे खड्डे का पडतात असे प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना कायमच पडतात.
असाच जत ते कवटेमहांकाळ मार्गावरील जीवघेणा धोकादायक खड्डा मुजवावा अशी मागणी होत आहे.