जत शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

0
Rate Card
जत : शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. लोकवर्गणीतून १६ लाखाहून अधिक रुपये खर्चून तयार केलेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतरावर उभा करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पुतळा समितीने जुन्या ठिकाणीच पुतळा बसविण्यात येणार असून जीर्णोद्धार करत असल्याने परवानगीची आवश्यकता नाही, असा दावा केला आहे.
तर याच मुद्द्यावरून पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात वातावरण चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात १९६२ साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु सोळा वर्षापुर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता. हा पुतळा तयार झाल्याने तो यावर्षीच्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) बसवण्यात यावा अशी लोकभावना आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला आहे.

परंतु, सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही, असा आदेश दिला आहे. त्यानंतर पुन्हा वातावरण तापले आहे. माजी आमदार जगताप यांनी आम्ही जुन्याच पुतळ्याचा जीर्णोद्धार करून पुतळा बसवत असताना प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली प्रशासकीय आडकाठी आणत आहे, असा थेट आरोप करत जिल्हाधिकारी, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवाय या विषयावरून जर काही उद्रेक झाल्यास त्यास जबाबदार सर्वस्वी जिल्हाधिकारी राहतील, असा इशारा देखील दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून शहरात वातावरण तंग बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहेत. मंगळवारी जवळपास एक हजार पोलिसांनी शहरात संचलन केले. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केले आहेत शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, बाजारपेठ प्रमुख रस्ते, जगताप पेट्रोल पंप आदी प्रमुख ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.