जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी पंचायत राज व्यवथा महत्वाची – पालकमंत्री जयंत पाटील

0

 

सांगली : जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी स्थानिक स्तरावरचे अधिकार स्थानिकानांच देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पंचायत राज व्यवथा महत्वाची असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अधिकारांचे बळकटीकरण होण्याची गरजही पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिपादीत केली.

जिल्हा परिषद स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद सांगली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सुहास बाबर, देवराज पाटील, अविनाश पाटील, मालन ‍ मोहिते, कांचन पाटील, प्रविण हेंद्रे, आशा पाटील, छाया पाटील, कमल पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, पदमाकर जगदाळे, दिनकरराव पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कै. वसंतदादा पाटील, कै. गुलाबराव पाटील, कै. राजारामबापू पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम केले आहे. जिल्हा परिषद सांगली ही दिग्गज नेतृत्व तयारी करणारी शाळा आहे. या शाळेने महाराष्ट्राला अनेक नविन नेतृत्व दिले आहेत. आताही जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून जी नविन पिढी तयार होत आहे तीही भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद सांगली ही नेहमीच राज्यासाठी मार्गदर्शक राहिली असून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी माझी शाळा आदर्श शाळा आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी स्मार्ट पी.एच.सी. असे दोन उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये जिल्हा परिषद सांगली ने अत्यंत चांगले काम केले असून 12 ते 14 वयोगटातील बालकांच्या लसीकरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल मंत्री मंडळाच्या बैठकीम मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे पुढील काळात कोरोनाचे संकट आले तरी आपण त्याचा ताकदीने मुकाबला करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्थानिक पातळीवरच जनतेला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होवू नयेत असा आम्हा सर्वांचा आग्रह आहे. त्यासाठी इम्पेरियल डाटा संकलित करण्याचे काम सुरू असून लवकरच जनतेच्या समस्यांची जाण असणारे, जनसेवेला प्राधान्य देणारे अभ्यासू प्रतिनिधी जिल्हा परिषद सभागृहामध्ये निवडून येतील. त्यातून विकासाची कामे अधिक सक्षमपणे होतील.

Rate Card

माजी मंत्री आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव नाईक यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज व्यवस्थेचा पर्यार्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा फार मोठा वाटा आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातूनच केंद्र व राज्य शासनाचा निधी ग्रामीण स्तरावर विकासासाठी नियोजनबध्द पध्दतीने वापरात आणला गेला. 1962 ते 1972 या कालखंडात जिल्हा परिषद यंत्रणांनी परिवर्तन घडविणारे कार्य केले. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात उत्तम समन्वय राहिल्यास विकासाची कामे गुणवत्तापूर्ण होतात.

याचे आदर्श उदाहरण सांगली जिल्हा परिषदेने घालून दिले आहे. या जिल्हा परिषद सभागृहात नेहमीच चांगल्या पध्दतीने कामकाज झाले आहे. सांगली जिल्हा परिषदेचा जसे पदाधिकारी चांगले लाभले तसेच अनेक चांगले अधिकारीही लाभले आहेत. जेवढे राज्य आणि केंद्र सरकारे महत्वाची आहेत तेवढेच पंचायत राज यंत्रणाही महत्वाची आहे. यावेळी त्यांनी पंचायत राज व्यवस्थेतील आपल्या प्रदीर्घ वाटचालीतील अनेक अनुभव अधोरेखीत केले.

यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले, कै. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पंचायत राज व्यवस्थेची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजली. ग्रामीण भागातील माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी कृषि, पशुसंवर्धन यासारखी ग्रामीण सेवेची खाती जिल्हा परिषदेकडे ठेवावीत. यावेळी त्यांनी सांगली जिल्हा परिषदेने हाती घेतलेली माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट पी.एच.सी. हे उपक्रम अधिक सक्षमपणे राबवून ग्रामीण विकासाचा कै. यशवंतराव चव्हाण यांचा उपदेश खऱ्या अर्थाने सफल करावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या विकासात आणि बळकटीकरणात पंचायत राज व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करून जिल्हा परिषदेमार्फत सुरू असणाऱ्या मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी.एच.सी. यांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागावर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.