औरंगाबादचं नामांतर करत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध न करता तातडीने मंजूर केली. त्यांचे आभार मानतो. आजपर्यंत ज्यांनी हे करायला हवं होतं त्यांनी केले नाही. ज्यांचा विरोध असल्याचं भासवलं गेले त्यांनी ठराव मंजूर करताना साथ दिली. ज्यांनी आपल्याला मोठं केले त्यांनाच विसरायचं. सत्ता आल्यावर ज्यांना भरपूर काही दिले ते नाराज झाले असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक शिवसैनिक भेटले, गरीब, वयोवृद्ध ज्यांना काही दिले नाही ते खंबीर साथ देतायेत याला माणुसकी म्हणतात. सुप्रीम कोर्टाने आज बहुमत चाचणी देण्याचा निर्णय दिला. लोकशाहीचं पालन झालेच पाहिजे. दीड पावणे दोन वर्ष विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी तातडीने मंजूर केली तर राज्यपालांबद्दल आदर आणखी वाढेल. जे दगा देतील असं सांगत होते ते सोबत होते. काँग्रेस बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे. आपली नाराजी सूरत, गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षा किंवा मातोश्री या हक्काच्या घरात येऊन सांगायचं होतं. तुमची नाराजी नेमकी काय आहे हे एकदा समोर बोलावं आजही मी हे बोलतोय असं त्यांनी सांगितले.