शरद पवारांच्या भूमिका अण्णा डांगे यांनी सत्य सांगावे ; विक्रम ढोणे यांचे आवाहन
सांगली : ज्येष्ठ नेते अण्णा डांगे हे गेल्या काही दिवसांपासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी संभ्रम करणारी माहिती देत आहेत. 2014 साली शरद पवार यांनी एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता,पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, असे अण्णा डांगे यांचे म्हणणे आहे.यासंदर्भातील सत्य डांगे यांनी सांगावे, तसेच पुरावे द्यावेत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
अण्णा डांगे हे संस्थापक असलेल्या धनगर महासंघाची नुकतीच धुळे येथे राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत अण्णा डांगे यांचे पुत्र अँड.चिमण डांगे यांची धनगर महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल एड़. चिमण डांगे यांचा सत्कार दि.26 डिसेंबर 2020 रोजी इस्लामपूर (ता.वाळवा) येथे होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाला धनगर समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात संधी मिळालेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ही उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमातून धनगर समाजाची दिशाभुल होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्यासह मंत्री जयंत पाटील यांनी आरक्षणप्रश्नी नेमकी भुमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी काडीचेही कामकाज झालेले नाही. नावाला एक बैठक झाली, पण तीही फुसका बार ठरली आहे. आता पुन्हा बैठकीचा फार्स होवू नये. मंत्रीसमिती स्थापन करून
आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली पाहिजे, अशी आमची भुमिका असल्याचे नमूद करून विक्रम ढोणे म्हणाले की, धुळे येथील
धनगर महासंघाच्या बैठकीत अण्णा डांगे यांनी केलेले विधान धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी अत्यंत महत्वाचे आहे. अण्णा डांगे हे अनेक
वर्षे आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत.
त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष महत्व आहे.अण्णा डांगे यांनी धुळे येथील बैठकीत बोलताना ‘शरद पवार यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण
समाजातील नेत्यांनी टीका केल्याने आरक्षण दिले नाही’, असे विधान केले आहे. 2014 साली बारामतीत धनगर समाजातील कार्यकर्त्यांना
पैसे देवून शरद पवारांच्या बदनामीसाठी मोर्चा काढण्यात आला, असेही डांगे यांनी म्हटले आहे. अण्णा डांगे यांचे हे आरोप गंभीर आहेत.