8,061 शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचा निधी वळता | जत तालुका : 36 गावांना पहिल्या टप्यात लाभ,90 गावे प्रतिक्षेत
जत,प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर महिन्यात बरसलेल्या अतिपावसाने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यांच्या नुकसान भरपाई पोटी जत तालुक्यातील 126 गावापैंकी 36 गावातील 8061 शेतकऱ्यांच्या 2 कोटी 44 लाख 82 हजार रूपये खात्यावर पहिल्या टप्यात वळते केले आहेत.तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे 126 गावातील 22 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान झाले आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी शासनाच्या प्राथमिक अहवालात कमी प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकरी असल्याची नोंद आहे. यामुळे राज्य शासनाने जत तालुक्याला त्यानुसार पहिल्या टप्यात हेक्टरी बागायत पिकांना दहा हजार,तर फळपिकांना 25 हजार रुपयांची मदत वळती केली आहे.
दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जत तालुक्यातील 8061 शेतकरी पहिल्या टप्यात मदतीस पात्र ठरले आहे.या शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. निम्मे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.यामुळे कही खुशी कही गम असे चित्र गावात आहे.
केवळ 36 गावांनाच पहिल्या टप्यात मदत मिळणार आहे.जून ते सप्टेंबरमध्ये 36 गावांमध्ये मोठे नुकसान झाले.अन्य गावांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पाऊस बरसला आहे.या निकषानुसार 126 गावांपैकी 36 गावे मदतीला पात्र ठरले.90 गावे अजूनही मदतीच्या निकषाबाहेर आहेत.या संदर्भात सुधारित प्रस्ताव पाठविला आहे.