कडेगाव : रशिया- युक्रेन युद्धामुळे तेथील विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न सुरु होते आज त्यास यश आले. हिंगणगाव ता. कडेगांव येथील विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या पाटील ही आपल्या स्वगृही सुखरूप पोहोचली. स्वगृही परतताच क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तीचा आमदार अरूण लाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर खळाळणारा आनंद खूप सुखावून गेला होता.
रशिया- युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाला त्याची झळ बसत आहे शिवाय अनेक भारतीय विद्यार्थी व विद्यार्थिनी तेथे अडकलेल्या आहेत. या मुलांना स्वगृही आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात राहायचं व त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांचे सांत्वन करावयाचे या दोन्ही गोष्टी करीत असताना खूप धीर धरावा लागत होता. मात्र आज तालुक्यातील विद्यार्थिनी घरी आल्याने केलेल्या कामाचे चीज झाले असे मनोमन वाटतंय,असे उद्गार यावेळी आ.लाड यांनी काढले.