५० टक्के सवलतीसाठी शेवटचे फक्त १० दिवस शिल्लक

0
Rate Card
सांगली : कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४५८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून त्यातील ३४ हजार १३२ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे.
दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजबिलांच्या तात्काळ दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यात येत आहे.

 

सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी दि. ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीजबिल व थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजबिल कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांना हातभार लावावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ६२३ शेतकऱ्यांकडे एकूण १२८६ कोटी ४२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता १०२५ कोटी ४३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या दि. ३१ मार्च २०२२पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे ५१२ कोटी ७१ लाख रुपये माफ होणार आहे व वीजबिल देखील संपूर्ण कोरे होणार आहे.

आतापर्यंत १ लाख २० हजार ४५८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी १७६ कोटी ३२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण १८० कोटी ९४ लाख रुपये माफ झाले आहेत.

 

यामध्ये ३४ हजार १३२ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण १०६ कोटी २० लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ६६ कोटी ५८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.