विवाह संस्कारातील धार्मिक विधींचे महत्व न्यायालयाकडूनही अधोरिखित !
हिंदु विवाहामध्ये जर आवश्यक ते विधी झाले नाहीत, तर तो विवाह ग्राह्य धरता येणार नाही. असे विवाह निरर्थक समजले जातील. नोंदणी केली, तरी हे विवाह वैध रहाणार नाहीत; कारण हिंदु विवाहामध्ये सप्तपदीसारखे विधी अतिशय महत्त्वाचे आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला. न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. ‘वादविवादांच्या प्रकरणात असे विधी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हिंदु विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तरुणांनी विवाहाचा विचार करतांना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा. हे सांगतानाच न्यायालयाने विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवणे, मद्य पिणे किंवा हुंड्यासह अनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम नाही. हा भारतीय समाजातील एक महत्त्वाचा समारंभ आहे. या समारंभाद्वारे स्त्री आणि पुरुष यांच्यात एक विशिष्ट नाते निर्माण होते, त्यांना पती-पत्नीचा दर्जा दिला जातो. या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. न्यायालयाच्या या निर्णयातून आणि त्यासंदर्भातील टिपणीतून हिंदू धर्मातील विवाह संस्कारातील विविध धार्मिक विधींचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.