0
97

पवार, ढोणे, खंडागळे, हटकर, आंधळे यांना युवा संघर्ष योद्धा पुरस्कार


पुण्यातील परिषदेत होणार गौरव; जानकर, शेट्टी, बच्चू कडू यांची उपस्थिती

पुणेः राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पुण्यात आय़ोजित युवा संघर्ष निर्धार परिषदेत अनिल पवार (उंबर्डे-खटाव, जि. सातारा), विक्रम ढोणे (जत, जि. सांगली), दत्तकुमार खंडागळे (विटा, जि. सांगली), सौरभ हटकर (खामगाव, जि. बुलढाणा), नितीन आंधळे (केज, जि. बीड) यांना युवा संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

गंजपेठ (पुणे) येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात रविवार २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही परिषद होणार आहे. या परिषदेला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या संयोजन समितीने या निवडी केल्या आहेत. चळवळीत काम करणाऱ्या युवकांना बळ मिळावे, या हेतूने हा गौरव केला जाणार आहे.
रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजितकुमार पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, प्रदेश कार्यकारणी सदस्या सुनिता किरवे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे शहर संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा वैशाली जाधव आदी उपस्थित होते.
अनिल पवार यांना पत्रकारितेची पार्श्वभुमी असून गेल्या दहा वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळत असताना शेतीत विविध प्रयोग केले आहेत. चांगले उत्पादन घेऊन त्याला चांगला भाव मिळण्यासाठी आंदोलने केली आहेत. खटाव तालुका आणि परिसरातील ऊस उत्पादकांचे प्रश्न त्यांनी धसास लावले आहेत. आले उत्पादकांसाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.


विक्रम ढोणे हे धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. व्होट बँकेच्या राजकारणासाठी सुरू असलेल्या फसवणुकीविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून होण्यासाठी आंदोलनात्मक पाठपुरावा केला आहे. या ठिकाणच्या पुतळा उभारणीवरून राजकीय दुकानदारी सुरू असताना त्यांनी राज्य शासनाला हस्तक्षेप करायला भाग पाडले. त्यांच्या या संघर्षामुळेच सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाला सुमारे १४ कोटींची तरतूद झाली आहे.


दत्तकुमार खंडागळे यांची रोखठोक पत्रकारिता सोशल मिडीयाचा प्रभाव वाढल्यापासून राज्यभर पोहचली आहे. लोकशाही मूल्ये आणि जनसामान्यांची बाजू घेऊन त्यांनी लिहलेल्या लेखांनी अनेकांच्या मेंदूचे कवाडे उघडी केली आहेत. धर्मद्वेषाचे राजकारण समावून सांगून युवा पिढीला लोकशाहीचा मार्गावर आणण्यासाठी ते देत असलेले योगदान महत्वपुर्ण आहे.


सौरभ हटकर हे मेंढपाळांच्या प्रश्नांवर अभ्यासू मांडणी करून रस्त्यावरील लढाई लढत आहेत. मेंढपाळपुत्र आर्मीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या टपाल सत्यागृहाची सर्वदूर दखल घेण्यात आली. सद्या एडवबर्ग विद्यापीठात ते मेंढपाळांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रवासावर संशोधन करीत आहेत. त्यांनी २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत.


नितीन आंधळे हे एमपीएसी, युपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करीत आहेत. विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषणे केली आहेत. नोकर भरतीतील घोटाळे बाहेर काढण्याबरोबरच भरतीतील पदांची वाढ करण्यात त्यांनी योगदान दिलेले आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, अमृत या संस्थांमधील शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भुमिका घेतेलेली आहे. त्यासाठी आझाद मैदानावर ५५ दिवस लक्षवेधी संघर्ष केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here